गणपतीच्या पुजनासाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री ( पाने )त्यांचे औषधी गुणधर्म

 *गणेश पूजनादरम्यान वापरल्या जाणाऱ्या २१ प्रकारच्या पत्री  (पानाबद्दल) काय म्हणते आपले आयुर्वेद? काय आहेत याचे फायदे ते पहा.

                  या निमित्ताने आपण हे झाड समजून घ्याल व त्याची लागवड कराल अशी अपेक्षा आहे.

                         २१ प्रकारच्या वनस्पतींची नावे -१)मधुमालती २)माका ३)बेल ४)दुर्वा ५)शमी ६)विष्णुकांत ७)आघाडा  ८)मंदार (रुई ) ९)तुळस १०)केवडा ११)जाई १२)बोर १३)धोत्रा १४)डोरली १५)कण्हेर १६)अर्जुन सादडा १७)डाळिंब  १८)मरवा १९)देवदार २०)पिंपळ २१)अगस्ती 

  खालील दिलेले उपचार तज्ञ व्यक्ती किंवा आयुर्वेद उपचार करणाऱ्या तज्ञाकडून प्रमाण व  पध्दत समजून घ्या.

 *१. अगस्ती(हादगा)* 

            प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असते.  'अ ' जीवनसत्त्वाचे वनस्पतीज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.अगस्तीची पाने, फुले, साली यांच्या वापरामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप हे आजार  नाहीसे होतात.


 *२. अर्जुन* 

                 अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.या झाडाची पाने जखमेवर ठेवून ती जखम बांधली तर जखम लवकर बरी होते.


 *३. आघाडा

               आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.आघाडा चा उपयोग अतिसार. रक्ती मूळव्याध, बद्धकोष्ठता यावर होतो.


 *४. कण्हेर

              कण्हेर हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.कण्हेरचा  उपयोग त्वचारोग विशेषत: इसबाप्रमाणे जुने जे त्वचा रोग असतात त्यावर आणि विंचवाच्या  दशावर कन्हेरीचे तेल उपयुक्त आहे.


 *५. केवडा

               केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.केवड्याच्या तेलामुळे उष्णतेचे विकार कमी होतात.


 *६. जाई 

                जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.जाई या वनस्पतीच्या पानांचा रस आमलपित्त, पोटशुळ  यासाठी वापरला जातो.


 *७. डाळिंब* 

                चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो.डाळिंबाची  साल दम्यासाठी आणि जुनाट  सर्दीसाठी उपयुक्त आहे.डाळिंबाच्या खोडाचा काढा पोट साफ करण्यासाठी वापरता येतो.


 *८. डोरली* 

             डोरलीसारखे रूप असणाऱ्या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.या वनस्पतीच्या पानांचा रस आमलपित्त, पोटशुळ  यासाठी वापरला जातो.डोरली  व जाई या पानांचा रस आमलपित्त, पोटशूळ  यासाठी वापरला जातो.


 *९. तुळस

                 तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.


 *१०.दूर्वा

            गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.डोळ्यांची रखरख, घोणा  फुटणे यावर दुर्वांचा रस वापरला जातो.

           ही गवतवर्गीय वनस्पती गणेशाला अतिशय प्रिय आहे.गणेश उत्सवामध्ये दररोज ही वनस्पती गणेशाला अर्पण केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे की मानवी जीवनामध्ये या वनस्पतीचे वेगवेगळ्या अंगांनी खूप महत्त्व आहे. ही वनस्पती मानवी आहारात असली पाहिजे,हीचे महत्व आपल्याला कळावे यासाठी धार्मिक कार्यात हीचा वापर केला जातो. ही वनस्पती वर्षभर जमिनींत उगवते, हिला फेब्रुवारी - मार्च मध्ये फुले येतात, उन्हाळ्यात या वनस्पतीच्या मुळ्या (काष्या) जमिनींत राहतात..पाउस पडला की यापासून ही वनस्पती तयार होतें. पोटाच्या सर्व आजारांवर ही गुणकारी आहे,त्वचेचे, नाकाचे, मूत्र विकार, रक्त शुध्दी, डोकेदुखी,साठी ही उपयोगी आहे.धार्मिक पद्धतीमध्ये हिचे लग्न वडाशी लावले जाते. या वनस्पतीला मरण नसल्यामुळे ही अमर आहे असे मानले जाते. ही भारतात सगळीकडे आढळते, खूप कमी जागेत ही येऊ शकते. शहरी भागातील लोकांनी कुंडीमध्ये किंवा परसबागेत हीची लागवड करून वाढविले पाहिजे.रोजच्या आहारात हिला पाण्यात उकळूण प्राशन केले,किंवा काहीं काड्या खाल्ल्या तरी आपण निरोगी जीवन प्राप्त करू शकतो. 


 *११.देवदार

                 चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.देवदारच्या पानांचा रस घेतल्याने मस्तकशूल, अंगदुखी, मुदतीचा ताप यासारखे आजार बरे होतात.


 *१२.धोत्रा

               धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.याचे बी विषारी  असते. धोत्राचे तेल जुनाट त्वचारोग, विंचवाचे  विष आणि अर्धांगवायू यावर उपयोगी पडते.


 *१३.पिंपळ

                पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.पिंपळाच्या  पानांचा उपयोग दमा, विसराळुपणा यावर केला जातो.


 *१४.बेल

                बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी. बेळफळाचा गर, बेलाची साल, आणि पाने पोट साफ करण्यास मदत करतात. बेळफळातील गराचा रस हा जंतूनाशक आहे.


 *१५.बोर

           बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.आमलपित्त,उन्हाळ्यांत होणारे आजार यावर बोराच्या पानांचा लेप किंवा काढा अतिशय गुणकारी ठरतो.


 *१६.मरवा

                मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणाऱ्या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.मरवा या वनस्पती चा उपयोग चर्म  रोगावर असून पोटशूळ, दंतशूळ यावर याचे तेल वापरले जाते.


 *१७.मधुमालती* 

               मधुमालती म्हणजे मालती ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.त्वचारोगावरही पानांचा रस वापरला जातो. 


 *१८.माका

                 भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.याच्या तेलाचा उपयोग उष्णतेचे विकार कमी होतात.माक्याच्या तेलामुळे मस्तक शांत राहते.केसांची वाढ  ही चांगली होते.


 *१९.रुई* (मंदार )

               अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.मंदारची पाने,चीक हा अंग दुखणे, कुत्रा चावणे यासाठी वापरला जातो.


 *२०.विष्णुकांत @

                  विष्णूक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी  बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.विष्णुकांत या वनस्पतीच्या मुळीचा  काढा कावीळ, मधुमेह, यावर उपयोगी ठरतो.


 *२१.शमी*

              शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.शमी च्या पानांचा काढा अतिसार, स्त्रियांचे आजार यावर गुणकारी आहे.

Comments

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

खाज कुहिली उपयोग व गुणधर्म